“तिरोड्यात नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच थांबला बालविवाह! दामिनी पथकाची धडक कारवाई
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील दामिनी पथक व जिल्हा महिला बाल विकास, इंडियन वेलफेर सोसायटी गोंदिया यांनी ग्राम सेलोटपार (केसलवाडा) ता. तिरोडा येथे संयुक्त कारवाई केली. नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच बालविवाह थांबविण्यात आल्याची घटना मंगळवार ६ जानेवारी रोजी उघडकीस आली. जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत सेलोटपार -केसलवाडा गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती ६ जानेवारी रोजी सकाळी ११. ०० वाजता प्राप्त झाली.
गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा आर. मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र सेलोटपार (केसलवाडा) ग्राम पंचायतचे ग्रामसेवक यांचेकडून प्राप्त करून घेण्यात आले.
सदर प्रमाणपत्रा नुसार बालिकेचे वय पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम सेलोटपार या गावात ११. ३० वाजता पोहोचले.
११. ३० वाजता मंडप पूजन कार्यक्रमाची तयारी झालेली होती.आज ७ जानेवारीला लग्न होणार होता.लग्नाची संपूर्ण तयारी झालेली,मंडप सजलेला,जमलेले वऱ्हाडी व जेवणाची तयारी झालेली असतांनाच दामिनी पथक व महिला बाल विकास विभागाच्या टीमने वर वधुच्या आई वडील आणि नातेवाईकांची चौकशी करुन होऊ घातलेल्या विवाहातील बालिकेचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले.याप्रसंगी जमलेल्या वराडी मंडळीची बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचे नेतृत्वात संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दामिनी पथकचा पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, मुकेश पटले संरक्षण अधिकारी, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक (असेस टू जस्टीस ) ज्ञानेश्वर पटले , भागवत सूर्यवंशी, रुपेश चुंडूके, धर्मेंद्र भेलावे, आशिष पुंडे, पूजा डोंगरे, , अमित बेलेकर, , पुर्नाप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, अमोल पानतावणे, दामिनी पथक गोंदिया चे प्रशांत बन्सोड, वैशाली भांडडकर, , सुवर्णा मडावी , सोनाली टिके, प्रीती बुरेले यांच्या सतर्कतेमुळे बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात यश प्राप्त झाले आहे.
कायदेशीर तरतूद:
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार, १८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
आवाहन :
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात असा कोणताही बालविवाह होत असल्यास त्वरित ‘चाइल्ड लाईन १०९८’ किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

