लॉर्ड बुद्धा टिवीला १५ वर्ष पूर्ण — संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा महाचर्चेचे महाराष्ट्रात आयोजन

wartaa.in
Share on

गोंदिया – भारतातील एकमेव आंबेडकराईट बुद्धिस्ट टेलिव्हिजन चैनल लॉर्ड बुद्धा टिवी या वर्षी आपल्या गौरवशाली प्रवासाची १५ वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संविधानालाही या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, या दुहेरी सोहळ्याचे औचित्य साधत लॉर्ड बुद्धा टिवी आणि राजकुमार बड़ोले फाउंडेशन एक भव्य प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला आहे.

१५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा हा वैचारिक महोत्सव महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या या महाचर्चेत राज्यातील प्रख्यात बहुजन विचारवंत, अभ्यासक, पत्रकार, इतिहासकार आणि सामाजिक कार्यकर्ते संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहेत.

या वैचारिक प्रवासाचा शुभारंभ १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार असून त्यानंतर हा कार्यक्रम चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांत पार पडणार आहे. समारोपाचा भव्य कार्यक्रम २६ नोव्हेंबर संविधान दिनी छाया-आकांक्षा (लाइव इन कॉन्सर्ट) भीम गीतांचा सुपरहीट कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालयाजवळ) आयोजित करण्यात आला आहे.

लॉर्ड बुद्धा टिवीचे प्रक्षेपण सध्या भारतातील २२ राज्यांमध्ये विविध केबल नेटवर्कच्या माध्यमातून २४ तास सुरू आहे. तसेच हा चैनल ओटीटी वर, मोबाइल अॅप वर, स्मार्ट टीव्ही आणि यूट्यूबवर देखील जगभरात उपलब्ध आहे.
लॉर्ड बुद्धा टिवीची सुरुवात २६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून झाली होती — आणि तेव्हापासूनच हे चैनल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बौद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवत आहे.

“भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान योगदानाचा जागर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे मुख्य संचालक सचिन मून यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या प्रबोधनात्मक प्रवासात सहभागी होऊन लॉर्ड बुद्धा टिवीच्या माध्यमातून संविधानाच्या मूल्यांचा जागर अनुभवावा, असे आवाहन राजकुमार बड़ोले फाउंडेशन चे राकेश भास्कर आणि प्रशांत शहारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *