सुकळी खैरी बिबट्याची दहशत: रात्री गाव वेढले मृत्यूचे सावट? वनविभागाच्या निष्क्रियतेने नागरिक संतापले!
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुकळी खैरी गाव आणि परिसरात सध्या बिबट्याचा प्रचंड त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या गावाच्या हद्दीत शिरून घरांच्या अंगणात ठेवलेल्या कोंबड्या उचलून नेत आहे, तसेच आसपासच्या गावांमध्येही त्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या सेत्रात (परिसरात) अनेक ठिकाणी बिबट्याने लोकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही शेतकरी आणि गावकरी जखमी झाले असल्याचे सांगितले जाते. रात्री बाहेर जाणं आता अत्यंत धोकादायक झालं आहे, कारण बिबट्या अनेकदा गावाच्या रस्त्यावर किंवा शेताच्या कडेला दिसून येतो. यामुळे नागरिकांमध्ये भितीचं सावट पसरलं आहे.
रात्री गावकऱ्यांची झोप उडाली
गावातील नागरिक रात्री बाहेर जाणं टाळत आहेत. अनेक कुटुंबं अंधार पडताच घराचे दरवाजे बंद करून लहान मुलांना घरात ठेवतात. गावातील जनावरं, कोंबड्या सुरक्षित ठिकाणी बांधण्यात येतात. तरीसुद्धा बिबट्या दररोज नवीन भागात शिरून त्रास देत आहे.
वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, वनविभागाकडून आतापर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांच्या repeated तक्रारी असूनसुद्धा ना पिंजरे लावले गेले, ना रात्री गस्त वाढवण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांचा वनविभागावर रोष वाढत आहे.
ग्रामस्थांच्या मते, “फक्त पाहणी करून जाणं हा उपाय नाही; बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई व्हायला हवी, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडू शकते,” असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
गावकऱ्यांनी वनविभागाला विनंती केली आहे की, बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत आणि रात्री गस्त वाढवावी. तसेच, ज्या भागात बिबट्याचे ठसे दिसले आहेत त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवावं असे त्यांचे म्हणणे आहे
सुकळी खैरी आणि आसपासच्या गावांमध्ये सध्या बिबट्याच्या भीतीचं सावट पसरलेलं आहे. लोकांमध्ये तणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढत असून, सर्वसामान्य नागरिक आता वनविभाग आणि प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी करत आहेत.

