पाकिस्तानची चिनी शस्त्रसामुग्री निष्प्रभ!
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषेवर तब्बल दोन-तीन दिवस तणावपूर्ण संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या वेबसाईटवरील एका अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, भारताने केलेल्या हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानकडे असलेली चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे निष्प्रभ ठरली.
ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय सैन्याने अशा प्रकारे आघाडी घेतली की, पाकिस्तानच्या हवाई दलाच्या सुमारे २० टक्के पायाभूत सुविधा नेस्तनाबूत झाल्या. अनेक महत्वाचे हवाई तळ निकामी झाले.
टोरांटोस्थित कुवा डिफेन्स न्यूज अँड अॅनालिसिस ग्रुपचे संस्थापक बिलाल खान यांनी सांगितले की, चीनकडून पाकिस्तानला मिळालेली एअर डिफेन्स सिस्टिम – विशेषतः HQ-9 आणि HQ-16 – भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांपुढे टिकू शकल्या नाहीत. भारताने आपल्या लक्ष्यांवर अचूक निशाणा साधत पाकिस्तानच्या सामरिक संरचनेवर जबरदस्त प्रहार केला.

