मुंबई गुजरातची राजधानी होती? शिवसेना केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद!
मुंबई | ‘जय गुजरात’ घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आधीच खळबळ उडालेली असताना, आता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
“मुंबई ही कधी काळी गुजरात राज्याची राजधानी होती,” असं प्रतापराव जाधव म्हणाले. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली असून, मुंबईच्या इतिहासावर नव्याने प्रकाशझोत टाकण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात दिलेल्या बलिदानांचं स्मरण अनेकजण करून देत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेनंतर आता प्रतापराव जाधव यांच्या विधानाने विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे.
इतिहासात डोकावून पाहिलं, तर 1956 पर्यंत अस्तित्वात असलेल्या ‘बॉम्बे राज्य’ मध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशाचे काही भाग समाविष्ट होते. पण ‘मुंबई गुजरातची राजधानी होती’ हा दावा नेमका कितपत योग्य आहे? इतिहासकार आणि अभ्यासक यावर काय म्हणतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

