बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांचे भव्य-दिव्य, हृदयस्पर्शी स्वागत

wartaa.in
Share on

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याचे भावनिक व प्रेरणादायी आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने पाच दिवसांच्या दौऱ्यावर झ्युरिक येथे दाखल होताच, बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांचे पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी झ्युरिकचे सभागृह दुमदुमून गेले आणि परदेशी भूमीवर मराठी अस्मितेचा जागर झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित मराठी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषेचा वसा आजही आपल्यासाठी दिशादर्शक आहे. या मूल्यांवर आधारलेला विकास हाच खरा शाश्वत विकास आहे. येत्या काळात महाराष्ट्र भारतातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य म्हणून उदयास येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विदेशातील मराठी म्हणजे महाराष्ट्राचे राजदूत

परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे आणि मराठी संस्कृतीचे राजदूत आहात. तुमचे कार्य, तुमचा शिस्तबद्ध स्वभाव, मेहनत आणि उद्योगशीलता हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. जगभरात मराठी माणसाला मिळणारा सन्मान हा तुमच्या कार्याचा परिणाम आहे. त्यामुळेच अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग भारतात, विशेषतः महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.

महाएनआरआय कनेक्ट : मराठी माणसांना जोडणारा सेतू

जगभर विखुरलेल्या मराठी समाजातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभव यांचे आदान-प्रदान होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी महाएनआरआय कनेक्टसारखे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित हे व्यासपीठ मराठी बांधवांमधील संपर्क, समन्वय आणि सहकार्य वाढवेल, ज्यातून नव्या संधी आणि समृद्धीचे मार्ग खुला होतील.

मराठी भाषा : सांस्कृतिक समृद्धीची ओळख

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचा उल्लेख करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, परदेशात मराठी शाळा चालवून, मुलांना मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडणारे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती संस्कृती, संस्कार, कला आणि परंपरेची वाहक आहे. महाराष्ट्र भौतिकदृष्ट्या जितका समृद्ध आहे, तितकाच तो सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न आहे.

महाराष्ट्र : विकासाचा वेग थांबणार नाही

महाराष्ट्र आज देशात थेट परकीय गुंतवणूक, स्टार्टअप्स, निर्यात आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आघाडीवर आहे. देशातील साठ टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. एआय, संरक्षण उत्पादन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा यामध्येही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईचा कायापालट सुरू असून, २०३० पर्यंत ती जगातील विकसित राष्ट्रांच्या राजधानींहून अधिक आधुनिक शहर म्हणून उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्येही विकासाचे चित्र दिसून येईल.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदेशातील मराठी बांधवांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *